मुलांच्या आहाराची काळजी पालकांना नेहमीच असते. सर्व आयांना वाटत असते की त्यांची मुले व्यवस्थित जेवत नाहीत. शाळेत जाणारी मुलांचे वय वाढीचे असते. या वयात मुलांची वाढ झपाट्याने होत असल्याने त्यांना आहाराची जास्त गरज असते.
संतुलित आहार अशा वयात फार गरजेचा असतो. पण आजकाल मुलांचे खाण्यात फार कमी लक्ष असते. त्यांचे सर्व लक्ष खेळणे, टीव्ही, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स यांमध्ये असते. या कारणामुळे त्यांना चिप्स, बिस्कीट, फास्टफूड यांबद्दल आकर्षण वाटते. त्यांना घरच्या जेवणात आनंद वाटत नाही. मग आयांना मुलांच्या आहाराची काळजी वाटणे साहजिक आहे. शाळेत संतुलित आहाराचे महत्व सांगितले जाते.
पण असा आहार कंटाळवाणा समजून तो पुस्तकातच राहतो. मुले अनुकरण करतात. मोठे जसे करतील ते सर्व करायला मुलांना आवडते. जर घरातील सर्व व्यक्तींनी चौरस आहार घेतला व मुलांना त्यांच्याबरोबर जेवण दिले तर मुलांमध्ये हीच सवय लागेल. लहानपणी आवडीच्या सिरिअल्स, कार्टून लावून पालक मुलांना जेवायला घालतात. त्याचे कारण असे की मुले ते पाहण्यात मग्न झाली की मग काहीही व कितीही प्रमाणात खातात.
भाज्या खायला मुले कंटाळा करतात. भाज्या खाण्याची सवय हळूहळू लावली पाहिजे. मुलांच्या आवडीच्या पदार्थात वेगवेगळ्या भाज्या घालता येतात. पराठे, कटलेट्स, पुलावमध्ये भाज्याचा उपयोग करू शकतो. अश्या प्रकारे भाज्या ही खाल्ल्या जातात.
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.