नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज एका प्रकरणाची सुनावणी करत असताना महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. लिव्ह इन मधील जोडप्याच्या जन्माला आलेल्या मुलांचाही वडिलांच्या संपत्तीत पूर्ण हक्क असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रकरणाची सुनावणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाने, जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र राहत असतील, तर ते लग्न मानले जाईल आणि या नात्यातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क असणार आहे, असे म्हटले आहे.
केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये तरुणाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानले नव्हते. कारण त्याच्या पालकांचे लग्न झाले नव्हते. दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे दीर्घकाळ एकत्र राहत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा देताना स्पष्ट केले. अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचे डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यास वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पूर्ण हक्क आहे असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे.
केरळमधील एका व्यक्तीने वडिलांच्या मालमत्तेत वाटा न मिळाल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. त्याने याचिका दाखल करताना म्हटले होते की, त्याला अनैतिक मुलगा सांगून वडिलांच्या संपत्तीत हक्क दिला जात नाही. केरळ उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते की, ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर तो दावा करत आहे, त्याच्या आईने त्याच्याशी लग्न केलेले नाही, अशा परिस्थितीत त्याला कौटुंबिक मालमत्तेचा हक्क समजता येणार नाही.