- मुलाची सुखरुप सुटका ः 12 तासात मित्रासह, आरोपी गजाआड
पिंपरी – पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून पतीने त्याच्या मित्राच्या मदतीने स्वतःच्याच तीन वर्षीय मुलाचे अपहरण केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 6) सायंकाळी दुपारी साडेपाच वाजता जीवन नगर, ताथवडे येथे घडला. गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत 12 तासात आरोपी वडील आणि त्याच्या मित्राला गजाआड केले.
महावीर किंचींक साळवे, मितेश उर्फ मितवा मारुती भगत (दोघे रा. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलाची आजी शोभा रामदास डोळस (वय 40, रा. जीवननगर, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वीरेंद्र महावीर साळवे (वय 3) असे अपहरण आणि सुटका झालेल्या मुलाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी वीरेंद्र घरासमोर खेळत होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्याचे अपहरण केले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखेला याप्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अपहरण केलेल्या व्यक्तीची ओळख पटवली. मितेश भगत याने हे अपहरण केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला केईएम हॉस्पिटल, रस्ता पेठ, पुणे येथून ताब्यात घेतले. वीरेंद्रचे अपहरण वीरेंद्रचे वडील महावीर याच्या सांगण्यावरून केल्याचे मितेशने सांगितले.
पोलिसांनी महावीर याला उरुळी कांचन बस डेपोच्या मागच्या बाजूला असलेल्या एका घराच्या टेरेसवरून ताब्यात घेतले. मुलाचे अपहरण केल्यानंतर मुलासोबत महावीर नातेवाइकाकडे जाऊन राहिला होता. महावीर आणि वीरेंद्र दोघेही झोपेत असतानाच पहाटे चार वाजता पोलिसांनी महावीरला ताब्यात घेतले.
पत्नी नांदत नसल्याने त्यामुळे मित्रासोबत मिळून वीरेंद्रचे अपहरण केल्याचे महावीरने पोलीस तपासात सांगितले. पोलिसांनी महावीर आणि त्याचा मित्र मितेश या दोघांना वाकड पोलिसांच्या ताब्यात दिले. तर वीरेंद्र याला त्याच्या आईच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो, गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे. सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंद, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.
यापूर्वीही दोनदा केले अपहरण
आरोपी महावीर साळवे याचे आपल्या पत्नीशी पटत नसल्याने त्या ताथवडे येथे राहतात. यापूर्वी आरोपी साळवे याने आपल्या पत्नीचे एकदा व मुलाचे एकदा अपहरण केले होते. मात्र त्यावेळी आरोपी महावीर याने स्वतः अपहरण केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नव्हता. आता मात्र त्याने अपहरण करण्यासाठी मित्राची मदत घेतल्याने गुन्हा दाखल होऊन आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे.