Chief Minister Eknath Shinde : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून सध्या देशासह राज्यातही नाराजी नाट्य सुरु आहे. त्यातच काल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगत राम मंदिर सोहळा राजकीय कार्यक्रम होऊ नये, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला होता. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सडेतोड उत्तर दिले आहे
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा राजकीय कार्यक्रम होऊ शकत नाही. असे बोलणाऱ्यांना राम भक्त उत्तर देतील. असे त्यांनी म्हटले.
त्यासोबतच “आता घरी बसलेले आहेत. राम भक्त कायमचे घरी बसवतील. म्हणून विचार करून विधानं करावीत. अयोध्येतील राम मंदिर हा करोडो भक्तांच्या अस्मितेचा विषय आहे.”असेही शिंदे यांनी यावेळी म्हटले.
“आधी काहीजण ‘मंदिर वहीं बनाएंगे, लेकीन तारीख नहीं बताएंगे’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायचे. मात्र, मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली आहे. आरोप करणाऱ्यांची अवस्था ‘मुंह में राम बगल में छुरी’ अशी आहे,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.