नवी दिल्ली: आपली मेघालयात झालेली बदली रद्द करावी अशी सुप्रिम कोर्टाच्या कॉलेजियम कडे करण्यात आलेली विनंती अमान्य झाल्याने मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिश विजया ताहिलरामानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद व सरन्यायाधिशांकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवून दिला आहे. त्यांची गेल्या वर्षी 8 ऑगस्ट रोजीच मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदी बढती झाली होती. त्यानंतर त्यांची मेघालयाच्या मुख्य न्यायाधिशपदी बदली करण्यात आली होती. पण ही बदली रद्द करावी अशी विनंती त्यांनी कॉलेजियमला केली होती. ती मान्य झाली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधिश म्हणून काम करीत असताना त्यांनी बिल्कीस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणात 11 आरोपींची जन्मठेप कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्यांच्या सेवा काळाची मुदत 2 ऑक्टोबर 2020 मध्ये संपत होती. पण त्याच्या आधीच त्यांना हा राजीनामा द्यावा लागला आहे.