श्रीनगर – काश्मीरातील विघटनवाद्यांनी काश्मीर बाहेरील व्यक्तींनाच लक्ष्य करण्याचे नवे धोरण स्वीकारले आहे.याच प्रयत्नांतून त्यांनी आज काश्मीरखोऱ्यात मजुरी करणाऱ्या छत्तीसगडच्या मजुराची पुलवामा जिल्ह्यात हत्या केल्याचे उघड झाले आहे.
दोन दिवसांपुर्वी राजस्थानातील ट्रक चालकाची तेथे हत्या करण्यात आली होती. राज्यात व्यवसाय धंदे आणि मजुरीच्या निमीत्ताने येणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठीच विघटनवाद्यांनी हे सत्र अवलंबले असल्याचे दिसून येत आहे.
काश्मीरात सरकारने पुरेसे सुरक्षा बंदोबस्त तैनात केले असले तरी तेथील दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याने राज्या बाहेरील भागातल्या लोकांसाठी काश्मीर हे सुरक्षित राहिलेले नाही असे संकेत यातून दिले जात आहेत. सरकारने हे राज्य पर्यटकांसाठी अलिकडेच खुले केले आहे पण त्यालाही अजून पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही.