मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित मुंबईतील सभा सुरू झाली आहे. सभेपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या मुद्दावर जोरदार हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले की, संभाजीनगर येथे अकबरुद्दीन ओवेसी आले होते. ते औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर लगेच भाजपचे लोक टीका करायला लागले. पण भाजपने हे लक्षात घ्यावं की, फडणवीसांच्या ५ वर्षांच्या काळात ओवेसी १० पेक्षा अधिक वेळा औरंगजेबाच्या कबरीला नतमस्तक होऊन गेला. तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का, त्याच्यावर कारवाई करायची, असा सवालही राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले की, औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दोहा येथे झाला होता. तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आमचा महाराष्ट्र त्याला पुरून उरला. त्यामुळे फरक लक्षात घ्या, असा टोलाही राऊत यांनी लगावला.