नवी दिल्ली – “चांद्रयान-2’चे विक्रम हे लॅंडर शनिवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग करण्याच्या बेतात असतानाच संपर्क तुटला आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देश क्षणांक्षणांचे अपडेट पाहत होता. मात्र, विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला आहे. विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला.
“चांद्रयान-2′ मोहीमेच्या संपूर्ण टीमने खूप छान काम केले आहे. देशाला इस्रोवर अभिमान आहे. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहे, तुम्ही पुढेही चांगले काम कराल अशी अपेक्षा करतो.
– राष्ट्रपती रामनाथ कोविंद
विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात की, आमच्या शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी इतिहास लिहिला आहे. संपर्क तुटला म्हणून वाईट वाटून घेऊ नका. आपल्या शास्त्रज्ञांनी खडतर मेहनत घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जय हिंद!’
– मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नवी दिल्ली
भारताला वैज्ञानिक प्रगत देशांच्या यादीत स्थान मिळवण्याचे ज्यांनी स्वप्न पाहिले त्यांच्यासाठी ही मोहीम योग्य श्रद्धांजली आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे. “चांद्रयान-2’साठी इस्रोच्या टीमने खूप मेहनत घेतली. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
– मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल
विज्ञानात अपयश वगैरे काहीही नसते. जेवढे अधिक प्रयोग केले जातात, तेवढे नवे आणि ज्ञानात भर पाडणारे अनुभवच मिळतात. इस्रोच्याशास्त्रज्ञांनी दिवसाची रात्र करून अविरत प्रयत्न केले. त्यांच्याबद्दल मनात नितांत आदर आहे. संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व आहे. जय हिंद!
– विराट कोहली, भारतीय क्रीकेट संघाचा कर्णधार
जेव्हा आपण आपल्या चुकांमधून आणि बसलेल्या धक्क्यांतून काही शिकत नाही, तेव्हा त्याला अपयश म्हणतात. आपण नक्कीच दमदार पुनरागमन करू. संपूर्ण भारताला एकत्रितपणे स्वप्न पाहायला शिकवणाऱ्या इस्रोच्याकामगिरीला मी सलाम करतो. इस्रो लवकरच सर्वोत्तम कामगिरी करेल.
– खासदार गौतम गंभीर
संपर्क तुटलेला नाही. प्रत्येक भारतीय व्यक्ती “चांद्रयान-2’च्या हृदयाची धडधड ऐकू शकतोय. ते आपल्याला एक संदेश देत आहे. तो संदेश म्हणजे, “जर पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही तर पुन्हा प्रयत्न करा.’
– आनंद महिंद्रा, महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा