कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरी बसवण्यात महाआघाडीचे काही नेते प्रयत्नशील आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगला समाचार घेतला आहे. हे खूळ काय पण बोलतोय, म्हणून प्रसारमाध्यमांनी त्यांची दखल घेतली नाही, अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली.
हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील हे प्रचंड अस्वस्थ आहेत. म्हणून ते अशा पद्धतीची विधानं करत आहेत. मला वाटतेय की हे त्यांचे विधान म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे, असे सर्वांनी संबोधावे असे हे विधान आहे. यामुळेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची दखल प्रसार माध्यमांनी घेतलीच नाही, असे म्हणत टीका केली.