मुंबई – ऐन लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी अमोल कोल्हे यांना भाजपमध्ये यावे वाटू शकते. त्यावेळी त्यांना विद्यमान खासदार म्हणून तिकीट द्यावेच लागेल, असे वक्तव्य करून कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेला सुरवात करून दिली आहे. खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा यापूर्वी रंगल्या होत्या.
ही चर्चा शांत होते न होते, तोपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा कोल्हे खरेच भाजपच्या वाटेवर आहेत का, याची कुजबुज सुरू आहे. खासदार कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा फेब्रुवारी महिन्यातही रंगली. पाटील यांनी एका मुलाखतीत आधी भाजप आणि शिंदे गटातल्या कळीच्या जागावाटपच्या मुद्यावरही भाष्य केले.
ते म्हणाले, आता शिंदे गटाकडे 49 चे संख्याबळ आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना तितक्याच जागा मिळतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणायचे नव्हते. त्यावर बैठका होतील. सर्वे केले जातील. लगेच निर्णय शक्य नाही. पाटील पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात नवीन माणसे येतील.
लोकसभा निवडणूक मार्चमध्ये सुरू होईल. ती सहा टप्प्यात होईल. त्याची जानेवारीत चर्चा सुरू होईल. त्यात हातकणंगले आणि शिरूरसारख्या मतदार संघाचे त्यांनी उदाहरण दिले. या मतदारसंघांचे काय करायचे, हे विषय चर्चेला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.