कोथरूड – एनडीए चौकातील (चांदणी चौक) नवीन उड्डाणपुलाची प्रतिक्षा आता संपत आली आहे. अवघ्या सहा दिवसांनी उड्डाणपुलाच्या उद्घटनानंतर वाहतूक सुरू होणार असून सकाळ-संध्याकाळ महामार्ग आणि सर्व्हिस रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल. दरम्यान, पुलावरील काम अंतीम टप्यात आले असून दोन लेनचे डांबरीकरण अंतीम टप्यात आहे.
राष्ट्रीय महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या 12 ऑगस्टला होणार आहे. कोथरूड, मुळशी, बावधनला जोडणारा हा उड्डाणपूल नक्कीच वाहनचालकांसाठी उपयोगी ठरणार असून उड्डाणपुलाची रूंदी वाढल्यामुळे पूल भव्य-दिव्य झाला आहे. पुलावरील नवीन डांबरीकरण, पांढरे पट्टे, दुभाजक आणि काळे-पांढरे रंग दिलेले सुरक्षा कठडे यातून पूल वाहुकीसाठी सुसज्ज ठेवण्यात आला आहे. कोथरूडकडून बावधन आणि पाषाण-बावधनकडून एनडीएकडे जाणाऱ्या वाहनांना दररोज वळसा घालून इच्छित स्थळी जावे लागत होते. हा वळसा वाचणार आहे.
उड्डाणपुलाचा वापर कसा होणार…
- एनडीकडून बावधनला जाणाऱ्या वाहनांसाठी
- कोथरूडकडून येणारी वाहने एनडीए रोडमार्गे येऊन यु-टर्न घेऊन पुलावरून बावधन आणि मुळशीकडे जाणार
- बावधनकडून मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी
- सातारकडून बावधनला जाणाऱ्या वाहनांसाठी
- बावधनकडून मुळशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी