मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसात हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यात थंडीत वाढ होणार आहे. मात्र आज काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आता मिचॉंग चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरीही कोकण, विदर्भात पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुढील २४ तासांत कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसात वातावरणात बदल झाल्याने थंडीची प्रतीक्षा होती. मात्र, येत्या आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या हवामानातील सततच्या बदलांमुळे आता मुंबईत गुलाबी थंडी पडणार आहे. मात्र, रात्री थंडी जाणवली तरी, मुंबईकरांना दिवसा उकाडा जाणवणार आहे. मुंबईच्या किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान १८ ते १९ अंशांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे.
बहुतांश ठिकाणी २४ ते ३१ तापमान
विदर्भात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. सोमवारी विदर्भात किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली घसरला आहे. गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यातही गारठा हळूहळू वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमान २४ ते ३१ अंशांच्या दरम्यान होते.