नवी दिल्ली : आगामी गुजरात निवडणुकीआधी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आणंद आणि मेहसाना जिल्ह्यात वास्तव्यास आलेल्या अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना नागरिकत्व बहाल करण्याचा आदेश दिला आहे.
या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे नागरिकत्व वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (सीएए) अंतर्गत देण्यात येणार नसून, नागरिकत्व कायदा, १९५५ अंतर्गत देण्याचा आदेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंबंधीचे अधिकार देण्यात आले आहेत.
‘सीएए’मध्येही पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चनांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मात्र सरकारने अद्याप कायद्यासंबंधी नियमावली तयार केली नसल्याने कोणालाही त्याच्या अंतर्गत नागरिकत्व दिले जात नाही.
गुजरातमधील या दोन जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या संबंधित लोकांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज दाखल करावा लागणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी त्याची छाननी करतील. तसेच अर्जाहसित आपला अहवाल केंद्राकडे सोपवतील. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधिकांना नागरिकत्व आणि यासंबंधीचं प्रमाणपत्रही दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.