मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील या हिसेंत आतापर्यंत एका शेतकऱ्याचा जीव गेले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनात प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्राच्या जाचक कृषी कायद्यावरून येथील शेतकरी आक्रमक आहेत. वास्तविक पाहता देशाच्या इतिहासात पंजाब राज्याचे योगदान मोठे आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वप्रथम पंजाब राज्य पुढं असते. पंजाबचा विचार करता केंद्र सरकारने या आंदोलनाकडे सामंजस्याने पाहण्याची आवश्यकता होती.
देशाच्या सुरक्षेत देखील पंजाबचे मोठे योगदान आहे. पंजाब राज्य कित्येक दिवस अस्थिर होतं. आता येथील स्थिती स्थिर आहे. मात्र केंद्र सरकारने कृषी कादद्यांच्या आडून पंजाब राज्याला अस्थिर करण्याचे पाप सरकारने करू नये, असा इशाराही शरद पवार यांनी दिला आहे.
दरम्यान शेतकरी कायद्यांसंदर्भात २००३ पासून चर्चा सुरू होती. मात्र सरकार बदलले आणि हा विषय मागे पडला. मात्र मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या कायद्यांवर सविस्तर चर्चा होणे आवश्यक होते. सिनेट कमिटीकडे हे कायदे पाठवायला पाहिजे होते, असंही पवार यांनी सांगितले.
आंदोलक शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यांपासून संयम राखला होता. त्यामुळे केंद्र सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं काम पाहणाऱ्यांनी शेतकरी आंदोलन समंजसपणे घेणे गरजेचे होते. आज आंदोलकांना लावलेल्या जाचक अटीमुळे हिंसा भडकल्याची शक्यता आहे. हिसेंचे समर्थन करता येणार नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून केंद्र सरकारने शहानपणा दाखवावे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.