मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने जे छापे टाकले त्यावरून राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला केवळ देशमुख यांची प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते पण त्याचा आधार घेत सीबीआयने अशा स्वरूपाची कारवाई करावी हे राजकारण आहे, असा आरोप केंद्र सरकारवर व सीबीआयवर केला जात आहे.
या संबंधात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. तथापि तरीही अनिल देशमुखांवर धाडी आणि एफआयआर हा अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत नाही. दया….. कुछ तो गडबड जरूर है अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, परमवीर सिंह यांच्या एका पत्रावरून राज्याच्या गृहमंत्र्यांवर इतकी मोठी कारवाई कशी केली जात आहे? या प्रकरणात केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचा राजकीय डाव केंद्र सरकार साधत आहे असे त्यांनी म्हटले आहे. वाझे स्वतःच आरोपी असताना त्याच्या म्हणण्यावरून कोणत्याही पुराव्याशिवाय इतकी मोठी कारवाई केली जात आहे याचाच अर्थ या मागे केवळ राजकीय हेतू आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
सीबीआयचा वापर करून राष्ट्रवादी कॉंग्रेसला बदनाम केले जात आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या कारवाईचा निषेध केला असून त्यांनी म्हटले आहे की, न्यायालयाकडून मिळालेल्या परवानगीचा दुरूपयोग करून सीबीआय आपला राजकीय हेतू साध्य करताना दिसत आहे. उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिला होता त्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला आहे. या साऱ्या प्रकरणात वाझे कोणाच्या सांगण्यावरून काम करीत होता व परमवीर सिंह यांची भूमिका काय होती हे अजून एनआयएने सांगितलेले नाही ते त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी नवाब मलिक यांनीही केली आहे.