नवी दिल्ली – भारतातील कोविड बाधितांचा आकडा रोज नवीन विक्रम नोंदवत असून देशात गेल्या चोवीस तासात तब्बल 3 लाख 46 हजार 786 लोकांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवसभरातील मृतांचा आकडाही 2624 ने वाढला असून करोनामुळे देशभरात मरण पावलेल्यांची संख्या आता 1 लाख 89 हजार 544 इतकी झाली आहे. रोज मोठ्या प्रमाणात करोना रूग्ण दाखल होत असल्याने देशातील सक्रिय बाधितांची संख्याही आता 25 लाखांच्या पार गेली आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील सक्रिय कोविड बाधितांची संख्या 25 लाख 52 हजार 940 इतकी झाली आहे. देशातील करोना रिकव्हरीचा दरही घटत असून हा दर आता 83.49 टक्के इतका खाली घसरला आहे. देशातील करोना बाधितांच्या आकड्याने 19 एप्रिल रोजीच दीड कोटींचा टप्पा ओलांडला आहे.