मॉन्ट्रियल – खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडामधील वाद चिघळत चालला आहे. कॅनडाने भारतातून आपल्या आणखी काही मुत्सद्दींना परत बोलावले आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सांगितले की, कॅनडाच्या भूमीवर एका शीख दहशतवाद्याच्या हत्येवरून झालेल्या वादानंतर त्यांनी भारतातून आपल्या मुत्सद्दींना परत बोलावले आहे.
परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, नवी दिल्लीने 21 कॅनेडियन राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुक्रवारपर्यंत भारत सोडण्याच्या औपचारिक योजनांची माहिती दिली आहे. भारताने कॅनडाच्या 41 राजदूतांची राजनैतिक सुरक्षा (पोलिटीकल इम्युनिटी) रद्द केल्यानंतर कॅनडाला हे पाऊल उचलणे भाग पडले आहे.
मेलानी जोली म्हणाल्या की, आम्ही भारताला राजदूतांच्या सुरक्षित परतीची सोय करण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ आमचे राजनयिक आणि त्यांचे कुटुंबीय मायदेशी परत येतील. कॅनडा सर्व देशांना लागू असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत राहील आणि भारताशी संबंध कायम ठेवेल, असेही जोली यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाचा नागरिक आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येशी भारतीय गुप्तचर संस्थांचा संबंध जाहीरपणे सांगितल्यामुळे भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले आहेत. मात्र, कॅनडातील कोणत्याही हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
कॅनडात याबाबत काही पुरावे असतील तर ते दाखवावेत, असेही सांगण्यात आले. पण कॅनडाने निज्जरच्या हत्येशी संबंधित कोणतेही पुरावे भारतासोबत शेअर केले नाहीत. निज्जर यांनी भारतापासून वेगळ्या शीख राष्ट्राची वकिली केली होती. कथित दहशतवाद आणि हत्येचा कट रचल्याप्रकरणी तो भारतीय यंत्रणांना हवा होता.
41 मुत्सद्दींची राजनैतिक सुरक्षा (पोलिटीकल इम्युनिटी) रद्द करणे हे केवळ अभूतपूर्वच नाही तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्याही विरुद्ध आहे, तसेच “परिस्थिती बिघडू नये” म्हणून कॅनडाची कोणतीही सूड कारवाई करण्याची योजना नाही, असे जोली यांनी बुधवारी सांगितले.