नाणे मावळ (अतुल चोपडे) – मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. एकीकडे वैयक्तिक भेटीगाठी सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावरही ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढला आहे. आपण आजपर्यंत केलेली कामे तसेच भविष्यातील करणार असलेली कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगून मतदारांना भुरळ घालण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने 5 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा केल्यापासून हवसे, नवसे, गवसे गुढग्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्या अगोदरच प्रचाराला सुरवात केल्याचे पहायला मिळत आहे. काही गावांमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. मात्र उर्वरित गावांमध्ये दुरंगी आणि तिरंगी पहायला मिळत आहेत. राजकीय पक्षांच्या समर्थकांसह काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने प्रचाराचा धुराळा उडायला लागला आहे.
बहुतांश उमेदवारांनी आकर्षक गाण्यांवर व्हिडिओ क्लिप, पोस्टर तयार केले आहेत. व्हॉटस्ऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा प्रभावी वापर करीत गावच्या विकासासाठी तरुणाईला साद घालत आहेत. गावात झालेली विकासकामे आपल्यामुळेच झाली असल्याचा दावा बहुतांशी उमेदवारांकडून केला जात आहे.
मावळ तालुक्यात यापूर्वी भाजपचे वर्चस्व होते. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी तालुक्यात अनेक विकासकामे केली. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणला. सुरवातीला राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्ष असे नवीन समीकरण निर्माण झाल्याने आमदार शेळके यांनी आपल्या मतदार संघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले अन् भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) महायुतीचे राज्य आले. कालांतराने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) सत्तेत सहभागी झाल्याने आता पुन्हा राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आली.
मावळचा विकास आपल्यामुळेच होत असल्याचे प्रत्येक पक्षाचा स्थानिक नेता सांगत आहे. गावागावात होणारी विकासकामे आमच्या पक्षाच्या नेत्यामुळेच झाल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार सांगत आहेत.
मराठा आरक्षणाचा कोणाला बसणार फटका
मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक नेत्यांनाही गावात प्रचारासाठी जात येत नाही. याचा फटका अनेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांना बसणार आहे. या गावबंदीमुळे गावात होणाऱ्या बैठका पूर्णपणे थांबल्या आहेत. तालुक्यातील नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गावबंदी केल्याने आपणे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे स्थानिक नेत्यांनी घोषित केले आहेत. मात्र हे नेते देखील आपल्या समर्थक उमेदवाराला मत द्यावे यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करीत आहेत.