जालना – मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 14 ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मोठी सभा आयोजित केली होती. या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले होते. मात्र या सभेवरून गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी टीका केली होती. सभेला जमलेल्या गर्दीला सदावर्ते यांनी ‘जत्रा’ असे संबोधले होते. यावरुन आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. सदावर्ते यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने सदावर्ते यांच्या वक्तव्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदावर्ते यांच्या विरोधात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जरांगे यांच्या सभेसाठी मराठा समाज एकवटला व आपल्या एकजुटीतून मराठा समाजाच्या वेदना दिसून आल्या. या सभेतील गर्दी ही कुठल्याही कॅमेऱ्यात व छायाचित्रातही मावनार नाही इतकी प्रचंड होती. परंतु, गुणरत्न सदावर्ते या व्यक्तीने या सभेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी ही सभा नसून जत्रा आहे असे वक्तव्य केल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून तातडीने सदावर्ते यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
काय म्हणाले होते गुणरत्न सदावर्ते?
“ही जी जत्रा भरली होती. त्या जत्रेमध्ये संविधानिक चर्चा झाली नाही. तुम्ही त्याला खूप मोठी सभा झाली, खूप मोठी सभा झाली, असं म्हणू नका. आपल्या आम्ही हिंदू राष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे. आमच्याकडे महादेवाची जी जत्रा असते, त्या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात लोकं असतात. जरांगेंच्या बोलण्याला किंमत द्यायची गरज नाही. कारण जरांगे हे त्यांच्या पॉलिटिकल बॉसच्या आधारावर बोलतात”, अशी टीका सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली होती.