राष्ट्रपतींकडे सादर केले निवेदन
पुद्दुचेरी : पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही.नारायणसामी आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे. बेदी यांना तातडीने माघारी बोलवा, असे साकडे नारायणसामी यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना घातले आहे.
कोविंद यांनी 23 डिसेंबरला पुद्दुचेरीचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्याकडे बेदी यांच्यासंदर्भात निवेदन सादर केल्याची माहिती कॉंग्रेस नेते असणाऱ्या नारायणसामी यांनी दिली. पुद्दुचेरीच्या विकासात नायब राज्यपाल या नात्याने बेदी यांनी कुठलेच योगदान दिले नाही.
मनमानी पद्धतीने कामकाज करणाऱ्या बेदी समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयांची आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात त्या अडथळे आणत आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून बेदींना माघारी बोलवावे, अशी मागणी त्या निवेदनात करण्यात आली आहे.
पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून बेदी यांचा नारायणसामी यांच्याशी विविध मुद्द्यांवरून संघर्ष होत आहे. त्यामुळे त्या केंद्रशासित प्रदेशातील कॉंग्रेस सरकारने बेदी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. आता तर बेदी यांना थेट हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.