सातगार पठार येथे बंधाऱ्यात मृत पाणीसाठा शिल्लक
पेठ – सातगाव पठार, (ता. आंबेगाव) भागात एकमेव असलेली वेळ नदी पूर्णपणे कोरडी पडली असून, नदीमध्ये असणाऱ्या बंधाऱ्यांतील पाणीसाठा देखील आटत चालला आहे, त्यामुळे सातगाव पठार भागातील नागरिकांना यंदा लवकरच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सातगाव पठार भागातील वेळ नदी कुरवंडी येथील वेळेश्वर डोंगरावरून उगम पावून कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव, वाफगावमार्गे भीमा नदीला जाऊन मिळते. या नदीला पावसाळ्यातील चार महिने आणि त्यानंतर सुमारे तीन ते चार महिने पाणी टिकते. पाणी आटत चालल्यानंतर नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी आडवले जाते; परंतु यंदा बंधाऱ्यांत आडवलेले पाणी देखील आटत चालले असून, काही बंधाऱ्यांत तर अगदीच मृत पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.
या बंधाऱ्यांमध्ये शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यावर या भागातील शेतकरी उन्हाळी पिके घेत असतात. सध्या या भागात बटाटा, ज्वारी, मका, कांदा तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात तरकारीचे पिक जोमदार अवस्थेत आहेत. पिके चांगली आलेली आहेत; परंतु आता नदीतील बंधाऱ्यांतील पाणी आटत चालल्याने पिकांना पाणी देण्यासाठी विहिरींतील पाण्याचा वापर करावा लागणार आहे, त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत देखील घट होणार असल्याने यंदा या भागात लवकरच पाणीटचांईची समस्या भेडसावणार असल्याचे मत रस्ता सुरक्षा समिती सदस्य अशोक बाजारे व वाकेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामशेठ तोडकर यांनी व्यक्त केले आहे.