मुंबई – संविधान रक्षणासाठी जे संघर्षमय कर्तव्य शरद पवार पार पाडत आहेत, अशा वेळेस शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभे राहणे गरजेचे होते. पण तुम्ही तुमचे कर्तव्य विसरलात, अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तापसेंनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनेतला खुले पत्र लिहिले आहे. यावर सत्तेत जनतेच्या भल्यासाठी सामील झालो आहे. हे कारण न पटणारे आहे, अशी टीका अजित पवारांवर करण्यात आली आहे.
महेश तापसे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर, त्यासाठी सत्तेत समील व्हावे हे अजित पवारांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. कारण 1984च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे फक्त २ खासदार निवडून आले होते.
जर या खासदारांनी काँग्रेसला समर्थन दिले असते आणि विकास कामासाठी सत्तेत सामील झालो, असे म्हटले असते. पण भाजपच्या त्या दोन खासदारांनी तसे केले नाही. आज देशात भाजपला अनेक लहान-मोठे पक्ष विरोध करत आहे, याची आठवणीही त्यांनी अजित पवारांना करून दिली आहे.