मुंबई – बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावर आजपर्यंतचा सर्वात भीषण अपघात झाला. या अपघातात बसने पेट घेतल्याने आणि डिझेलची टाकी फुटून आग पसरल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
अश्यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मात्र इतरांची स्वप्न उद्ध्वस्त करणे चुकीची बाब आहे…’ अशी खोचक टीका खडसे यांनी केली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “समृद्धी महामार्ग हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हापासून या समृद्धी महामार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. अपघातात मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पावत आहेत. या ठिकाणच्या अपघाताची आकडेवारी पाहिली तर 100 दिवसात या समृद्धी महामार्गावर 900 पेक्षा जास्त लहान-मोठे अपघात झाले आहेत.
या अपघातामध्ये शेकडोच्या संख्येने लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत.एकीकडे समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी इतरांची स्वप्न उद्ध्वस्त करणे चुकीची बाब आहे.’ असं ते म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, अपघाताची ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या अपघातात मृत्यू झालेल्यांची कुटुंब उघड्यावर आली आहेत. या घटनेतील सर्व मृत मयत आत्म्यांना शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. असं देखील ते यावेळी म्हणाले.