मुंबई – तूट मर्यादित ठेवून पायाभूत सुविधांवरील खर्च वाढविण्याचे अर्थसंकल्पात ठरविले आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळेल, या आशेने आजही शेअर बाजारात जोरदार खरेदी होऊन निर्देशांकांत भक्कम वाढ नोंदली गेली. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळेही गुंतवणूकदारांचा खरेदीचा उत्साह कायम होता.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 695 अंकांनी वाढून 59,558 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 203 अंकानी म्हणजे 1.16 टक्क्यांनी वाढून 17,780 अंकांवर बंद झाला.
खरेदी वाढल्यामुळे सेन्सेक्स संदर्भातील 30 कंपन्यांपैकी 21 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. उत्तर प्रदेशासह इतर पाच राज्यांत निवडणुका असूनही अर्थसंकल्प संतुलित पद्धतीने सादर केला गेला आहे. तूट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कारणामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे विश्लेषकांना वाटते. इंडस इंड बॅंकेचा शेअर आज पाच टक्क्यांनी वाढला. बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, कोटक बॅंक, ऍक्सीस बॅंक तेजीत राहिली. महिंद्रा, मारुती या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
आगामी काळामध्ये वित्तपुरवठा वाढण्याची शक्यता असल्यामुळे बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदली गेली. सकाळी युरोप आणि आशियाई शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे खरेदी कायम राहिली. पायाभूत सुविधा
आणि किफायतशील घरांसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे एचडीएफसी सिक्युरिटजचे विश्लेषक दीपक जसानी यांनी सांगितले. यामुळे घर बांधणी क्षेत्राला चालना मिळणार असल्याचे दिसून येते.
परदेशी गुंतवणूक परत जाण्याचा धोका
अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात उमेद आली असली तरी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून मात्र विक्री कायम राहण्याची शक्यता आहे. काल या गुंतवणूकदारांनी 21 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. अमेरीका किती व्याजदर वाढ करते आणि भांडवल सुलभता किती कमी करते यावर परदेशी गुंतवणूक अवलंबून राहणार आहे.