नवी दिल्ली – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘गांधी’ पदवी वापरण्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी गांधी कुटुंबाला ‘डुप्लिकेट सरदार’ म्हणजेच बनावट सरदार म्हटले आहे. गुवाहाटी येथे भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संबोधित करताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी गांधी परिवार देश तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. यासोबतच त्यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना गांधी पदवी परत करण्याची विनंती केली आहे.
सरमा म्हणाले, या कुटुंबाने बरेच घोटाळे केले आहेत. त्यांच्या घोटाळ्याची सुरुवात गांधी या उपाधीने झाली. त्यांनी केवळ घराणेशाहीला प्रोत्साहन दिले आणि देश तोडण्याचे काम केले. मी राहुल गांधींना गांधी पदवी परत करण्याची विनंती करतो.”
हिमंता सरमा यांनी दिल्लीतील जी-20 शिखर परिषद 2023 दरम्यान स्वीकारलेल्या ‘दिल्ली घोषणा’बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींमुळेच हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. येत्या दोन वर्षांत “कामाख्या कॉरिडॉर’ तयार होईल. केवळ पंतप्रधान मोदींमुळेच युक्रेन-रशिया युद्धादरम्यान दिल्लीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
यासोबतच हिमंता सरमा यांनी कॉंग्रेसने सत्तेत असताना देशासाठी काहीही केले नसल्याचा आरोप करत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होत असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, कॉंग्रेसने देशाच्या स्वातंत्र्याची 25 वर्षे किंवा 50 वर्षे साजरी केली नाही. पण, पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली. पंतप्रधान मोदी भारताला जागतिक नेता बनवण्याचे काम करत आहेत.
जी-20 दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबद्दल बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा म्हणाले, “काल जेव्हा मी पंतप्रधान मोदींना जागतिक नेत्यांशी संवाद साधताना पाहिले तेव्हा मला जाणवले की भारत आता जागतिक नेता बनला आहे. आता महिला देशाच्या नेत्या आहेत. त्या नेतृत्व करत आहे. मोदींनी महिला शक्ती आणि महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष दिले आहे.