लखनौ – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागून अयोध्येला भेट देण्याची चांगली संधी मिळाली होती. मात्र, त्यांनी ती संधी दवडली. राज अतिशय दुर्दैवी आहेत. दुर्दैव त्यांची पाठ सोडत नाही, अशी प्रतिक्रिया उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिली.
राज यांनी आगामी अयोध्या दौरा स्थगित केला. त्यावर सिंह यांनी उत्तरप्रदेशातील गोंडा येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
राज यांनी संतांची, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माफी मागितली असती; तर त्यांच्या विषयीचा उत्तर भारतीयांचा राग कमी झाला असता. मात्र, माफी न मागून राज यांनी उत्तर भारतीयांच्या जुन्या जखमा ताज्या केल्या. राज यांनी माफी न मागितल्याने ते उत्तर भारतीयांच्या विरोधातील मोहीम योग्य मानत असल्याचे सिद्ध होते, असे सिंह म्हणाले.