– विकास मुढे
भारतीय संघाला दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकून दहा वर्षे झाली. भारतीय संघाने आजच्या दिवशीच म्हणजे 2 एप्रिल 2011 साली दुसर्यांदा विश्वचषक जिंकला होता. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 28 वर्षापासून विश्वचषक जिंकण्याचे अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले होते. याआधी कपिल देव यांनी भारतीय संघाला 1983 पहिला विश्वचषक मिळवून दिला होता.
अंतिम लढतीत भारताने गमावला होता नाणेफेकीचा कौल
या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता. हा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. त्यावेळी झालेली नाणेफेक कुमार संगकाराने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कारण वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची शक्यता जास्त होती.
महेला जयवर्धनेची 88 चेंडूत 103 धावांची शतकी खेळी
श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 274 धावा केल्या होत्या. श्रीलंका संघाकडून सर्वाधिक धावा महेला जयवर्धने केल्या होत्या. त्याने 88 चेंडूत 103 धावांची शतकी खेळी साकारली होती. त्याचबरोबर तळातील फलंदाज नुवान कुलसेकराने 30 चेंडूत 32 धावा केल्या होत्या. भारताच्या झहीर खान व युवराज सिंग यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर श्रीसंतनेही 1 बळी टिपला होता.
गौतम गंभीरची अविस्मरणीय खेळी
भारतीय संघाला 275 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचे सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग झटपट बाद झाले. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या होत्या. परंतु गौतम गंभीरने आपल्या नावाप्रमाणेच ही परिस्थिती सुद्धा गांभीर्याने घेत अत्यंत महत्त्वपूर्ण अशी खेळी साकारली. त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर आक्रमण केले. यावेळी अक्षरशः गंभीरची बॅट तुटली होती. त्याची ती खेळी क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहिल अशीच होती.
https://twitter.com/HemdipsinhRath1/status/1377896569177956352?s=19
गौतमची विराट, धोनीसोबत अनुक्रमे 83 आणि 103 धावांची भागीदारी
गंभीरने विराट कोहली सोबत तिसर्या गड्यासाठी 83 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली हा भारताची 114 धावसंख्या असताना वैयक्तिक 35(49) धावांवर बाद झाला होता. त्यानंतर ही गंभीरने महेंद्र सिंग धोनी सोबत गड लढवणे सुरूच ठेवले. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 103 धावांची भागीदारी केली. त्यामुळे या सामन्याचे रुप पालटले. मात्र आपल्या शतकासाठी 3 धावा कमी असताना, भारताचा लढवय्या फलंदाज गौतम गंभीर 97(122) धावांवर बाद झाला.
https://twitter.com/HemdipsinhRath1/status/1377896569177956352?s=19
धोनीनं षटकार खेचत विजयावर केलं शिक्कामोर्तब
भारतीय संघाला 11 चेंडूत 4 धावांची गरज असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलसेकराच्या तिसर्या चेंडूवर उत्तुंग असा गगनचुंबी षटकार खेचत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर धोनी 91(79) धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे संपूर्ण भारतीयांचे आणि सचिन तेंडुलकरचे स्वप्न 28 वर्षानंतर सत्यात अवतरले होते.
Those were the days 🙂#10YearsOf2011WC #WC2011 pic.twitter.com/Dp1AFqKFhT
— Hemanth Shaiva 2.0 (@Hemanth__Shaiva) April 2, 2021