मुंबई – महाराष्ट्राची आजची सकाळ हादरवणाऱ्या दुर्घटनेनं झाली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘इर्शाळवाडी’वर काल रात्री दुखाचा डोंगर कोसळला. इर्शाळवाडीवर दरड कोसळून 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 98 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं आहे. तर शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत. सध्या या ठिकाणचं बचावकार्य थांबवण्यात आलं असल्याचं सांगितलं गेलं आहे.
मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणांकडून सुरू असलेले घटनास्थळावरील बचावकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या, शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. याठिकाणी ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्यामदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु होत.
दरम्यान, जवळपास चाळीस कुटूंब हे दरडीखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इर्शाळवाडीत पोलीस कंट्रोल रूमची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी 8108195554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या या भागातील परिस्थिती अतिशय भयानक असून, नागरिकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहेत.