नागपूर – भाजपामध्ये प्रवेश घेण्यासाठी पवार कुटुंबियांना लक्ष्य केले जात आहे. कुणालाही काही निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत केले होते, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे काही दिवसांत राज्यात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या भाजपात जाण्याची चर्चा आहे. यावर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट झाली. त्यावेळी पवार कुटुंबियांवर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दबाव टाकल्या जात आहे. राष्ट्रवादीच्या काही आमदारांना ईडी, सीबीआय कारवाईची भीती भाजपाकडून घालण्यात येत आहे.
त्यामुळे कुणी आमदार जर भाजपाच्या गळाला लागला तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. तो पक्षाचा निर्णय नसेल. राष्ट्रवादी पक्ष म्हणून भाजपाला कधीच साथ देणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले, असा दावा राऊत यांनी केला.
जो सरकारच्या विरोधात प्रश्न विचारेल त्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल, आम्हीदेखील अशा प्रकारचे पीडित आहोत, सत्यपाल मलिक आणि अदानी प्रकरणी जे प्रश्न विचारण्यात आले त्यावर चौकशी होत नाही. मात्र, सरकार विरोधात प्रश्न विचारल्यावर सीबीआय, ईडीचे समन्स येतात व अटक केली जाते, हे भाजपाचे दबावतंत्र असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.
ते आमदार-खासदारही होते
पोलीस चकमकीवर आम्ही कधीच प्रश्न उपस्थित केले नाहीत, मुंबईतही यापूर्वी पोलीस चकमकी झाल्या आहेत. तो कायदा सुव्यवस्था राखण्याचा एक प्रयत्न असतो, पण पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात घुसून गुंड-माफिया का असेना कोणाची हत्या होते, तेव्हा सरकारच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. ते माफिया गुंड होते, त्यांच्यावर गुन्हे होते, पण अनेक वर्षे आमदार-खासदार होते. हे विसरता येत नाही, असे संजय राऊत म्हणाले.