मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसून आले, तसेच टोकाचे मतभेद वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि अखेर हा वाद विकोपाला गेल्याचं दिसून आलं. आणि त्यानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अखेर कॉंग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला.
कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झालं, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला होता. त्यामुळे या दोन नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं.
दरम्यान, पक्षातील या वादावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी मीडियामध्ये बातम्या पाहिल्या. बाळासाहेब थोरात यांनी काहीतरी पत्र लिहिलेलं आहे. पण, मी याबाबत कुणाशीही अधिकृत बोललो नाही. नॅशनल हायवेसंबंधात महत्त्वाची मिटिंग होती. त्यामध्ये मी व्यस्त होतो.
पण, सोशल मीडियावर बातम्या पाहिल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांना वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा ट्वीटरवर दिल्या आहेत. पण, माझं बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. यात काय घडामोडी घडल्या याची माहिती घेऊन आपल्याशी बोलेन, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.