नगर -“एकच व्यक्ती एक पद’ अन् “एक कुटुंब एक पद’ असे धोरण खुद्द कॉंग्रेसने आणले असतांना त्या धोरणाला आता त्या पक्षानेच तिलाजंली दिल्याचे चित्र नगर जिल्ह्यात दिसत आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम व योग्य व्यक्ती न सापडल्याने एकाच कुटुंबाकडे कॉंग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची वेळ पक्षावर आली आहे. महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधाताई नागवडे असतांना आता त्यांचे पती व श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसची सर्वच भिस्त एकट्या नागवडे कुटुंबावर येऊन पडली आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात कॉंग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी जिल्हा कॉंग्रेसमय होता. पक्ष संघटनेतील पदांसाठी मोठी रस्सीखेच असायची. मात्र गेल्या काही वर्षांत कॉंग्रेसकडे पक्ष संघटनेसाठी देखील व्यक्ती शोधूनही सापडत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अर्थात प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र नागवडे याची नियुक्ती करण्यात आली असली तरी त्या पदासाठी सध्या तरी पक्षाकडे योग्य व सक्षम उमेदवार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकाच कुटुंबाकडे कॉंग्रेसची दोन्ही महत्वाची पदे देण्याची वेळ पक्षावर आली आहे.
यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी जानेवारी महिन्यात पदाचा राजीनामा दिला. तेही सुरवातीला प्रभारीच होते. परंतू काही महिन्यांनंतर हे नियमित जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. माजीमंत्री व कॉंग्रेस विधीमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असलेले साळुंके विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आमदार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याने प्रदेशपातळीवरून त्यांच्यावर कारवाई बाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्या दरम्यान ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर टाकण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काळे यांच्यावर प्रभारी म्हणून ग्रामीण जिल्हाध्यक्षाची धुरा दिली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी मार्च महिन्यात ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे राजेंद्र नागवडे यांच्याकडे देण्यात आली.
सध्या तरी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासह ग्रामीण जिल्हाध्यक्ष ही दोन्ही पद नागवडे कुटुंबाकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसची भिस्त नागवडे कुटुंबाकडे आली आहे. ही जबाबदारी नागवडे कशा पद्धतीने पार पाडणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नागवडे हे देखील आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे आ. थोरात यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे.