सातारा – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रभक्त होते, मी त्यांना सलाम करतो. प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका, मते वेगळी असली तरी देशातील वातावरण कलुषित होण्यास सर्वच राजकीय पक्ष कारणीभूत आहेत. माझ्यावर आतापर्यंत 14 हल्ले झाले असून मी बोनस जीवन जगत आहे. देशात शांतीसाठी माझे सुरु असलेले प्रयत्न मी मरेपर्यंत थांबवणार नाही, असे मत दहशतवादविरोधी अभियानाचे प्रमुख एम. एस. बिट्टा यांनी व्यक्त केले. बालन फाउंडेशन, परिवर्तन सामाजिक संस्था यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी एम. एस. बिट्टा साताऱ्यात आले होते.
कार्यक्रमानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बिट्टा म्हणाले, “”भारत लोकशाहीप्रधान देश असून येथे सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, मात्र असे होताना दिसत नाही. राजकारणाचे स्वरुप बदलत असल्याने देशात वातावरण दूषित होण्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब देशाच्या अखंडतेसाठी धोकादायक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रभक्त होते, त्यांना सलाम करतो. याबाबत प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका असल्याने या मुद्यावरुन देशातील वातावरण कलुषित होत आहे, ही बाब गंभीर असून सर्वच राजकीय पक्षांनी विचार करून देशहितासाठी काम करणे गरजेचे आहे. अखंड हिंदुस्तान हे माझे स्वप्न असून पंजाब दशहतवादमुक्त करणे हे माझे ध्येय होते. मी कधी राजकारण करत नाही.
सामाजिक काम करताना देशात सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने राहिले पाहिजेत. शांती प्रस्थापित होण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. माझ्यावर एवढे हल्ले झाले आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनी मला देशासाठी सोडले आहे.” हैदराबाद येथे झालेली घटनेनंतर संशयितांचे एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांचा हैदराबाद येथे जाऊन सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाचे रक्षण करणारे हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना शासन मदत करत असले तरी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना मदत करणे गरजेचे आहे. धारीवाल फाउंडेशन यामध्ये पुढाकार घेत असून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी फाउंडेशनमार्फत उचलण्यात येत आहे. राज्यातील हुतात्मा जवानांची जिल्हावार माहिती घेऊन त्यांना फाउंडेशनमार्फत मदत करण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असेही बिट्टा म्हणाले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, पुनित बालन, जान्हवी धारीवाल उपस्थित होते.