वडगाव मावळ – विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते, असे आपण नेहमीच ऐकत आलो आहेत. मात्र मावळच्या राजकीय गुन्हेगारीत नेत्याला संपविण्याचा एक नवीन पॅटर्न तयार झाला आहे.2009 पासून मावळमध्ये भरदिवसा, भर चौकात तर कधी कॅबिनमध्ये घुसून सात राजकीय नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांच्या देखील मावळात हत्या झाल्या आहेत.
निसर्गाचे भरघोस वरदान लाभलेला डोंगर-दऱ्यांचा मावळ तालुका कधी काळी खूपच शांत होता. आपल्या नैसर्गिक सौंदर्याने हा तालुका सर्वांना आकर्षित करतो. पुणे आणि मुंबई या दोन बड्या शहरांच्या मध्ये असल्याने पाहता-पाहता येथे वेगवेगळे औद्योगिक प्रकल्प येऊ लागले आणि जमिनींचे भाव आकाशाला भिडले. काही जणांकडे आलेली आर्थिक सुबत्ता राजकीय महत्त्वाकांक्षांना जन्म देत होती. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण सर्वच स्तरावर वापरले जाऊ लागले. यात मावळची मात्र ओळख बदलू लागली आणि भितीदायक हत्या आणि अपराध घडू लागले. प्रामुख्याने राजकीय महत्त्वाकांक्षा आणि आर्थिक व्यवहारांमध्ये राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या बऱ्याच जणांना यात प्राण गमावावे लागले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मावळचा निम्मा भाग येतो. त्यामुळे आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर येथील गुन्हेगारी कमी होईल, अशी भाबडी आशा मावळवासियांना होती. मात्र सध्या उलट चित्र पाहायला मिळत आहे. चोऱ्या, लूटमार, खंडणी, हाणामारी, विनयभंग, लैंगिक अत्याचार या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मावळची वाटचाल गुन्हेगारी तालुक्याच्या दिशेने होत असल्याचे दिसून येते.
मागील महिन्यात 1 एप्रिल रोजी मावळातील शिरगाव येथील विद्यमान सरपंचांची भर रस्त्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. 12) तळेगाव दाभाडे येथील नगरपंचायत कार्यालयाच्या आवारातच भरदिवसा जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची कोयत्याने वार करून व गोळया घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. मागील काही वर्षांपासून मावळात राजकीय नेत्यांच्या हत्यांचे प्रमाण वाढत असल्याने भितीचे वातावरण आहे.
असा आहे हत्यांचा इतिहास
26 मे 2009 रोजी लोणावळा नगरपरिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष राजू चौधरी यांची भरदिवसा लोणावळा नगरपरिषदेत गोळया घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
4 ऑगष्ट 2015 रोजी कामशेत येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी मनसेचे तत्कालीन मावळ तालुकाध्यक्ष बंटी उर्फ मंगेश वाळुंज यांची भर दिवसा रस्त्यावर गोळया घालून हत्या करण्यात आली होती.
6 सप्टेंबर 2015 रोजी आढे गावचे तत्कालीन नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब केदारी यांची भरदिवसा रस्त्यावर अडवून कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
17 ऑक्टोंबर 2016 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांना रस्त्यावर अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करून व गोळया घालून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
26 ऑक्टोबर 2020 रोजी लोणावळ्याचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची भर दिवसा सकाळी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
1 एप्रिल 2023 रोजी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचीही कोयत्याने वार करीत हत्या करण्यात आली.
12 मे 2023 रोजी जनविकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची गोळ्या घालून अन् कोयत्याने वार करीत हत्या करण्यात आली.