बलरामपूर, (उत्तर प्रदेश) – गरिबांकडून पैसा काढून घेऊन आपल्या श्रीमंत मित्रांचे खिसे भरणे हेच भाजपचे काम आहे, अशी टीका समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे.
भाजपच्या या धोरणामुळेच उत्तर प्रदेशातील जनता आता भाजपला कंटाळली आहे आणि निवडणुकीत समाजवादी पार्टीला विजयी करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.
बाबा मुख्यमंत्र्यांनी आता 11 मार्च रोजी लखनौपासून गोरखपूरपर्यंतचे आपले तिकीट निश्चित केले आहे, असेही ते उपरोधिकपणे म्हणाले.
उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 61 मतदारसंघांमधील अयोध्या, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबाकी, बहराइच, श्रावस्ती, गोंडा, अमेठी आणि रायबरेली या 12 जिल्ह्यांमधील मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या मतदारसंघांमधील 692 उमेदवारांचे भविष्य आज ठरणार आहे. यानंतर 3 मार्च आणि 6 मार्च रोजी उत्तरुप्रदेशच्या उर्वरित टप्प्यांचे मतदान होणार आहे.