नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावर आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रतिक्रिया दिली आहे.
जेपी नड्डा यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना केलेली अटक म्हणजे संविधानाच्या मुल्यांचा अपमान आहे. अशा कारवाईला आम्ही घाबरणार नाही. शांतही बसणार नाहीत. भाजपला जनआशीर्वाद यात्रेत मिळत असलेल्या आफाट पाठिंब्यामुळे महाराष्ट्र सरकार त्रस्त झालं आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने याविरुद्ध लढू, जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहिल, असं नड्डा यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणेंच्या घरी पोहोचले.