मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान झालेला भाजपला चालतो. मात्र, महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या पंतप्रधानांचा निषेध राज्यातील भाजप नेते घेत नाहीत. महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल. मात्र, मोदींविरोधात बोलणार नाही अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. आज भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा उघड झाला असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये कॉंग्रेसने भाजपविरोधात पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. कॉंग्रेसच्या आजच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप हेदेखील सहभागी झाले. तर, दुसरीकडे भाजप खासदार गोपाळ शेट्टी, मिहीर कोटेचा, आमदार राम कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजप आंदोलनाच्या बाजूने सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. “सागर’ बंगल्यावर मोर्चा नेण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाम होते. आम्ही 100 ते 150 कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन करू पाहणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कॉंग्रेसच्या आंदोलनापूर्वी फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेल्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेरही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.