कोलकाता – कोलकाता शहरात बोगस करोना लसीचे रॅकेट चालवले जात असल्या प्रकरणी आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोलकाता महापालिकेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांना अडवण्यात आले असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रकार घडला.
यातून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठीच झटापट झाली. भाजप कार्यकर्त्यांना हा मोर्चा काढण्यास अनुमती नाकारण्यात आली होती. परंतु तरीही त्यांनी हा मोर्चा काढल्याने पोलिसांनी त्यांना अडवले होते. या प्रकरणात नंतर अनेक भाजप कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.
करोना लसींचे बोगस रॅकेट चालवणाऱ्यांशी तृणमूलच्या नेत्यांचे संबंध असल्याचा आरोप प्रदेश भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. या प्रकरणात मोर्चा काढून निषेध नोंदवण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण पोलिसांनी राजकीय दबावापोटी आमच्या मोर्चाला अनुमती नाकारली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.