लोकांचे जीव वाचवण्यासाठी सहकार्य करण्याचे मोहन जोशी यांचे आवाहन
पुणे – महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार आणि भाजपने चालवलेले सुडाचे राजकारण थांबवून, लोकांचे जीव वाचवावेत, असे आवाहन माजी आमदार मोहन जोशी यांनी भाजप नेत्यांना केले आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न फसले. त्यानंतर नैराश्यातून मोदी सरकार आणि भाजप नेत्यांनी सूडाचे राजकारण करून सरकार बदनाम कसे होईल असे उद्योग चालवले आहेत, असा आरोप जोशी यांनी केला.
केंद्र सरकारकडून निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. कोविड नियंत्रणासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा, असे पंतप्रधान मोदी म्हणतात मात्र महाराष्ट्राला लसीचा पुरवठा अपुरा केला जातो आणि राज्य सरकारची कोंडी केली जाते.
महाराष्ट्राला औषधे, इंजेक्शन्स पुरवल्यास कारखान्यांना टाळे ठोकू, असा इशारा औषधे उत्पादक कंपन्यांना आणि पुरवठादारांना केंद्र सरकारने दिला आहे. हा प्रकार धक्कादायक आणि घृणास्पद आहे, असा आरोपही जोशी यांनी केला आहे.
भाजप नेत्यांनी सुडाचे राजकारण थांबवावे जनतेला वेठीस धरण्याऐवजी, लोकांचे जीव वाचवण्यासाठी सहकार्य करावे. महाराष्ट्राला, केंद्र सरकारकडून जास्तीतजास्त मदत मिळवून द्यावी, अशी विनंती जोशी यांनी केली आहे.