मुंबई – राजकारणात रडीचा डाव खेळायचा हे विरोधी पक्षातील नेत्यांनी ठरवलेलंच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, राजकारणातील लढाई आपण जनतेच्या कोर्टामध्ये लढूया. परंतु, तुम्ही मध्येच शिखंडीसारखा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत आहात. सरकारविरोधी भूमिका घ्यायची असेल तर जनतेत जाऊन स्वत:बद्दलची विश्वासार्हता सिद्ध करा. आम्ही कसे चूक आणि तुम्ही कसे बरोबर हे सिद्ध करा. मात्र असे न करता भाजप सरकारी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
ईडीद्वारे तपास सुरू झाल्यानंतर जामिन लवकर मिळत नाही, मालमत्तेवरील जप्ती लवकर मुक्त होत नाही आणि वर्षानुवर्षे केस बंद होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कारवाया या फक्त भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांवरच होतात. भाजपमधील नेते शूचिर्भूत आहेत का? काही नेत्यांनी तर अशा प्रकारच्या कारवाईच्या भीतीने भाजपमध्ये प्रवेश केला आणि म्हणू लागले आता आम्हाला शांत झोप लागते. हा सगळा प्रकार म्हणजे रडीचा डाव आहे. जसा ऊस पिळवटून टाकल्यानंतर त्याचं फक्त चिपाड उरतं. अगदी त्याचप्रकारे माणसालासुद्धा पिळवटून टाकण्याचं काम या केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे होत आहे. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीसुद्धा मनी लॉण्ड्रींगच्या कायद्याविरोधात भाष्य केले आहे. तसेच आताही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा अवास्तव वापर केला जात आहे, असेही मंत्री भुजबळ म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. विरोधकांना आणखी दोन वर्ष थांबायला लागेल. जर आम्ही काही चुकीचं केलं असेल तर जनता त्यांचा कौल देऊन तुम्हाला निवडून देईल. मात्र विरोधकांना थांबण्यासाठीसुद्धा सवड नाही, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या या चौकशीला तुम्ही कायदेशीर उत्तर का देत नाहीत? या प्रश्नावर ते म्हणाले की, विरोधकांच्या या भूमिकेला कायद्याने उत्तर देण्यासाठीसुद्धा बरीच वर्षे जातील. त्यामुळे आपण दोषी नाहीत हे आम्हाला फक्त प्रसारमाध्यमांमार्फतच जनतेपर्यंत पोहोचवावे लागेल. भाजप करत असलेला अन्याय लोकांना कळत आहे. बऱ्याच जणांना ईडीच्या नोटीसा आल्यानंतर त्यांनी केलेला भाजपप्रवेश हा देखील लोकांना माहीत आहे. त्यामुळे लोकांना काही समजत नाही अस भ्रम ठेवू नका. लोक निवडणुकांच्या वेळेला मतदानाद्वारे यावर तोडगा काढतात. त्यामुळे तुम्हाला लढायचं असेल तर राजकारणाच्या मैदानात येऊन लढा. ईडी, सीबीआयच्या मागून लपून लढू नका. एकेकाळी काही विरोधक मोदी व भाजपच्या विरोधात बोलत होते. मग त्यांना ईडीची नोटीस गेली आणि त्यांच बोलणं थांबलं, असे मंत्री भुजबळ म्हणाले.
दरम्यान, राजू शेट्टी यांच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर ते म्हणाले की, “राजू शेट्टी यांच नाव आपण विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे दिलं होतं. शरद पवार यांच्याद्वारे त्यांना त्या पदावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यपालांनीच त्या जागांवर शिक्कामोर्तब केले नव्हते. त्यांचे काही गैरसमज झाले असतील म्हणून ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले असावेत.”