आमदार बाबुराव पाचर्णे यांचा दावा : शिरूर-हवेलीतील पदाधिकारी संपर्कात
….आता कोणते पदाधिकारी?
शिरूर-हवेली राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक मातब्बरांनी शिवसेनेत यापूर्वीच प्रवेश केला आहे. या दोन्ही तालुक्यातील 40 पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचाही यामध्ये समावेश आहे. यामुळे राष्ट्रवादीचे कोणते आणि किती कार्यकर्ते भाजपमध्ये जाणार? की, शिवसेनेत गेलेले पदाधिकारी, कार्यकर्तेच भाजप पळविणार, अशीही चर्चा शिरूर, हवेली तालुक्यात सुरू झाली आहे.
पुणे/शिरूर – शिरूर-हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक मातब्बरांनी शुक्रवारी (दि.2) शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी पडझड झाल्याचे मानले जात आहे. त्याचत आता याच दोन्ही तालुक्यांतील राष्ट्रवादीची आणखी काही पदाधिकारी, कार्यकर्ते मंडळी भारतीय जनता पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे जाहीर करून आमदार बाबुराव पाचर्णे यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप आणि शिवसेना युतीच्या निर्णयावर अद्यापही शिक्का मोर्तब झालेले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, कार्यकर्त्यांनी युतीचा विचार न करता भाजप सर्वच्या सर्व जागांवर उमदेवार उभे करणार असल्याचा विचार करून तयारी करावी, असे आदेश दिल्याने भाजप-शिवसेना युतीबाबत अद्यापही शाशंकता आहे. यातूनच शिरूर-हवेली मतदार संघात दोन्ही पक्षांत चुरस निर्माण झाली आहे. युती झाली नाहीच तर भाजपकडून विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे आणि शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके हे संभाव्य उमेदवार असतील असे मानले जात आहे.
यातील प्रमुख विरोधक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार रिंगणात असेल, यामुळेच भाजप आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा गडच ढासळविण्याचे धोरण अवलंबण्यात येत आहे. याचे फलित म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी शिरूर-हवेलीतील राष्ट्रवादीला सुरवातीला सुरूंग लावून 40 पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत खेचून आणले आहेत. यामुळे कटके यांची या मतदारसंघातील ताकद प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शिरूर तसेच हवेलीतील अनेक नाराज मंडळी शिवसेनेत आणण्यात कटके यांना मोठे यश आल्याचे मानले जात आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादीला सुरूंग लावण्याचे काम झालेले असतानाच आता भाजपचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे हे ही राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
भाजपच्या माध्यमातून गेल्या पंचवार्षिकमध्ये शिरूर, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आमदारकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्याही पदाधिकारी, कार्यकर्त्यांला नाराज न करता किंवा पक्षीय राजकारण न करता केवळ विकासकामांवर भर दिल्याने अनेक राष्ट्रवादीची मंडळी संपर्कात आहेत. याच मुद्द्यावर भाजपमध्ये येण्यास अनेक जण इच्छुक असल्याचा दाव आमदार पाचर्णे यांनी केला आहे. यानुसार शिरूर व हवेली तालुक्यातील अनेक मातब्बर मंडळी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, यामध्ये हवेलीतील पदाधिकारी, कार्यकत्यांची संख्या मोठी असल्याचेह आमदार बाबूराव पाचर्णे यांनी स्पष्ट केले आहे.