नवी दिल्ली – भाजप खासदारांच्या मुलांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला होता, कारण घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी धोकादायक आहे आणि पक्ष याच्या विरोधात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले आहे. घराणेशाहीच्या राजकारणाशी लढण्यासाठी भाजपला संघटनेतील अशा प्रथांवर अंकुश ठेवावा लागेल,असेही मोदींनी यावेळी ठामपणे सांगितले.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मोदी बोलत होते. ज्या पाच राज्यांत निवडणुका झाल्या त्या मतदारसंघातील ज्या बुथवर भाजपला कमी पते पडली त्याची कारणे शोधण्याची सुचनाही मोदींनी यावेळी केली. या बैठकीत मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा पक्षाच्या चार राज्यांतील निवडणुकीतील विजयाबद्दल सत्कार करण्यात आला.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरू झाल्यानंतर भाजपच्या संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती. मोदी आणि नड्डा या दोघांनीही या बैठकीला संबोधित केले.या बैठकीबाबत पत्रकारांना माहिती देताना संसदीय कामकाज मंत्रालय प्रल्हाद जोशी म्हणाले की, मोदींनी बैठकीत सांगितले, देशात घराणेशाहीच्या विरोधात वातावरण आहे आणि लोकांच्या या भावनेचा आदर करत भाजपने पक्ष नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला.
पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णय स्वीकारला याबद्दल त्यांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी युक्रेन मधील भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांबद्दलही माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, सरकार जेव्हा युक्रेन मधील भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी काम करत होते, तेव्हा काही राजकीय नेते या समस्येचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत होते.
योग्य आणि अचूक आकडेवारी व तपशीलांशिवाय ते विधाने करत होते असे पंतप्रधानांनी नमूद केल्याचे जोशी यांनी सांगितले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचेही मोदींनी कौतुक केले आणि असे चित्रपट अधिक वेळा बनवायला हवेत, असे त्यांनी यावेळी नमूद केले.