जयपूर – काही राजकीय पक्ष लोकांचे लक्ष अन्यत्र विचलीत करीत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. याद्वारे ते देशाच्या भवितव्याशी खेळत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही मात्र असल्या फंदात पडत नाही. भारतीय जनता पक्षाने गेल्या आठ वर्षात विकासाचा मुद्दाच राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य पटलावर आणला आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
त्यांनी विरोधी पक्षांवर घराणेशाहीचा आरोप याही बैठकीत केला. ते म्हणाले की आपल्या सरकारची आठ वर्षे देशाच्या संतुलित विकासासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी समर्पित होती. भाजपने विकासाला राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले असताना, काही राजकीय पक्ष आपल्या संकुचित फायद्यासाठी देशाच्या भवितव्याशी खेळत आहेत.
कधी जातीच्या आधारावर तर कधी प्रादेशिकतेच्या नावाखाली ते लोकांना भडकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक तणाव निर्माण करून हे लोक समाजात विष पेरण्याचे काम करीत आहेत असा आरोपही पंतप्रधानांनी केला. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न घेऊन पुढे जाणाऱ्या भाजपने लोकांना या शक्ती आणि पक्षांपासून सावध करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. भाजपचा अग्रदूत असलेल्या जनसंघाच्या काळापासून देशभक्ती, राष्ट्रहित आणि राष्ट्रनिर्माण हे धोरण आमच्या केंद्रस्थानी होते, असे नमूद करून ते म्हणाले की, या देशभक्तीने पक्षाला विकास आणि विश्वासावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित केले आहे.
ते म्हणाले की आम्हाला कधीही कोणताही शॉर्टकट घ्यावा लागत नाही. देशाच्या हिताशी निगडित मुख्य मुद्द्यांवर आम्हाला पुढे जायचे आहे. आमची पावले भरकटता कामा नयेत आणि आमची जीभ घसरू देऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केले. गरिबांचे कल्याण, गरिबांचे जीवन सुसह्य करणे, गरिबांना सशक्त करण्यासाठी आपल्याला कार्यरत राहावे लागेल असे ते म्हणाले.
देशाच्या मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचे असंख्य प्रयत्न केले जातील पण आपण मात्र विकासाच्या मुद्द्यांवर चिकटून राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी भाजप सदस्यांना केले.भाजप राजकीय फायद्यासाठी जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काही विरोधी पक्षांनी सातत्याने केला आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी हाच आरोप आज विरोधी पक्षांवर केला.