कोलकता –देशभरात विविध विरोधी पक्षांचे नेते ईडीच्या रडारवर आले आहेत. त्याचा संदर्भ घेऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. किती अत्याचार, अनिर्बंधपणा सुरू आहे. ईडीच्या छाप्यांच्या नावाखाली भाजप डर्टी गेम खेळत आहे, असा आरोप त्यांनी केला.
गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे जवळपास महिनाभर ममतांचा फारसा सार्वजनिक वावर नव्हता. त्या कालावधीत त्यांनी कुठली जाहीर भूमिकाही मांडण्याचे टाळले होते. मात्र, गुरूवारी त्यांनी पत्रकार परिषद बोलावून भाजपवर टीकेची झोड उठवली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर छापासत्र सुरू आहे. मात्र, भाजपच्या एका नेत्याच्या घरावर तरी छापा पडला का, असा सवाल त्यांनी केला.