मुंबई : क्रिकेट आणि राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. अगदी पराभवाच्या तोंडावरही विजय मिळवता येत, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची चर्चा सुरू झाली. गडकरी यांचे विधान महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर त्याला महत्व प्राप्त झाले आहे.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या मानसिकतेत आहे. त्याबाबत शरद पवार यांनी ही महाआघाडी पाच वर्ष स्थीर सरकार देईल, असे संकेत दिले. त्या पार्श्वभूमीवर स्पष्टवक्ते म्हणून नावलौकीक असणाऱ्या गडकरी यांच्या विधानाला महत्व आले. क्रिकेट आणि राजकारण यात काय होईल हे सांगता येत नाही. कधी कधी पराभूत होईल असे वाटत असताना विजय खेचून आणता येतो, असे ते म्हणाले होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला जनादेश मिळाला. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून दोन्ही पक्षात फूट पडली. भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगण्याकडे राजकीय वारे वाहू लागले, या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी हे विधान केले.
काय आहे ऑपरेशन लोटस
कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी जनता दल आणि कॉंग्रेसचे 17 आमदार फोडून अपेक्षित बहुमताचा आकडा येडीयुरप्पा यांनी पार केला होता. त्यामुळे तशीच व्युहरचना करण्याच्या तयारीत भारतीय जनता पक्ष असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत रंगल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने काल पक्षाचे आणि पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची बैठक निमंत्रित केली. त्यामुळे या चर्चेला पुन्हा तोंड फुटले.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या मानसिकतेत आहे. किमान समान कार्यक्रम शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने निश्चित केला. त्यामुळे हे पक्ष सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. दादर येथील एका कार्यालयात भाजपाची गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बैठक सुरू झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान राष्ट्रवादीच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी दोन दिवसांत कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भेट घेणार असून या भेटीत सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. कॉंग्रेसच्या मनात काही संदेह असल्यास शरद पवार तो दूर करतील, हे सरकार दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने कसे महत्वाचे आहे हे समजावण्यात पवार यशस्वी होतील.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले असल्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. सत्तेतील पदांच्या वाटपाचे सूत्र ठरवण्यात येणार आहे.