नवी दिल्ली : दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याच्या आरोपावरून ज्या कंपनीचा तपास सक्तवसुली संचलनालयाकडून केला जात आहे, त्याच कंपनीकडून भाजपला कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचा आरोप आज विरोधकांनी केला.
मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी इक्बाल मिर्चीकडून मालमत्ता खरेदी केल्याबद्दल या कंपनेची चौकशी करण्यात येत आहे. “टेरर फंडींग’चा आरोप म्हणजे देशद्रोह नाही का, असा प्रश्न कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही भाजपा उघडा पडला असल्याचे म्हटले आहे.
एका न्यूजपोर्टलने या संदर्भातील वृत्त दिले आहे. “टेरर फंडींग’च्या आरोपाची “ईडी’कडून चौकशी होत असलेल्या कंपनीकडून मोठ्या रकमेच्या देणग्या भाजपला दिल्या गेल्या आहेत. निवडणुक आयोगाकडे भाजपने केलेल्या निवेदनांचा संदर्भ या वृत्तासाठी देण्यात आला आहे.
दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार असलेल्या इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्चीकडून मालमत्ता खरेदी करणाऱ्या या कंपनीने भाजपला 2014-15 मध्ये 10 कोटी रुपये दिले गेले होते, असे या वृत्तात म्हटले आहे.
“इलेक्टोरल बॉन्ड’ पासून “टेरर फंडिंग’मधील आरोपींकडून देणग्या अशी भाजपची “देणगी गाथा’ आहे. इक्बाल मिर्चीकडून मालमत्ता खरेदी करणाऱ्यांच्या देणग्या स्वीकाराव्या का लागला? हा देशद्रोह नही का? असा प्रश्न सुर्जेवाला यांनी गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये केला आहे.
दहशतवादी आरोपी मिर्ची या तीन कंपन्यांशी थेट संबंध आहेत. या कंपन्यांनी निवडणूक बॉंड्स योजनेतून भाजपला देणग्या दिल्या आहेत, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. या मुद्दयावर पंतप्रधानांनी स्पष्टिकरण द्यायला हवे, असे “सीपीआय’चे सरचिटणीस डी. राजा यांनी म्हटले आहे.