नवी दिल्ली : भारतीय नौसेनेला तातडीने तिसरी विमानवाहू नौका मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी एका कार्यक्रमात दिले. विमानवाहू नौकांच्या खरेदीचा निर्णय घेताना किंमत हा महत्वाचा घटक आहे, असे ते म्हणाले.
भारतीय सागरी क्षेत्रात चोवीस तास गस्त घालण्यासाठी दोन गट तयार करण्यासाठी तीन विमानवाहू जहाजांची गरज आहे, असे नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांनी तीन फेब्रुवारी रोजी सांगितले होते. चीनच्या नौदलाच्या सामर्थ्याला तोंड देण्यासाठी ही आवश्यक बाब असल्याचे नौदलाचे म्हणणे होते.
पाणबुडी ही नौदलाची कमतरता होती. त्यावेळी आपण पाणबुडीच्या खरेदीला प्राधान्य दिले, असे जनरल रावत पत्रकारांना म्हणाले. त्यांनी तीनही सेवादलांतील ताळमेळाची कल्पना पत्रकारांना दिली.
सध्या भारतीय नौदलाकडे आयएनएस विक्रमादित्य ही रशीयन बनावटीची विमानवाहू युध्द नौका आहे. भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही युध्दनौका 2022पासून पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल.
भारताने अद्याप तिसरी विमानवाहू नौका खरेदी केली नाही असा थेट प्रश्न त्यांना विचारता ते म्हणाले, त्याची (आयएनएस विक्रांत) कामगिरी कशी करते ते पाहू असे ते म्हणाले. आपल्या जाहजांना सामरिक बळ देण्यासाठी समुद्रात लष्करी तळ उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.