Bihar Seat Sharing । लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब झालाय. त्याची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. आज दुपारी राजद कार्यालयात होणाऱ्या पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जातीय. या पत्रकार परिषदेत महाआघाडीत समाविष्ट सर्व पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बिहारमधील 40 पैकी 26 जागांवर आरजेडी निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस 9 आणि डावे 5 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. याशिवाय झारखंडमधील दोन जागांवर आरजेडी आपले उमेदवार उभे करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजेडी झारखंडच्या पलामू आणि चतरा येथून निवडणूक लढवणार आहे.
काँग्रेस कोणत्या जागांवर लढणार? Bihar Seat Sharing ।
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये काँग्रेसच्या खात्यात कटिहार, किशनगंज, पटना साहिब, सासाराम, भागलपूर, बेतिया, मुझफ्फरपूर, समस्तीपूर आणि महाराजगंज या जागांचा समावेश आहे. तर, सीपीआयएमएल करकट, आराह आणि नालंदा या जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर सीपीआय आपला उमेदवार बेगुसरायमधून तर सीपीआयएम खगरियामधून आपला उमेदवार उभा करणार आहे.
पूर्णियाची जागा काँग्रेसने गमावली
या आघाडीत राजदचा वरचष्मा दिसत आहे. पक्षाला सर्वाधिक जागा तर मिळाल्याच, पण पूर्णिया आणि बिहारच्या जागाही काँग्रेसला मिळालेल्या नाहीत. पूर्णिया मतदारसंघातून पप्पू यादव काँग्रेसच्या वतीने तिकीटावर दावा करत होते. तिकडे आरजेडीने विमा भारती यांना उमेदवार म्हणून घोषित केले.
‘या’ जागा आरजेडीच्या वाट्याला
आरजेडी औरंगाबाद, मधेपुरा, गया, जमुई, नवादा, सारण, पाटलीपुत्र, बक्सर, उजियारपूर, जेहानाबाद, दरभंगा, बांका, अररिया, मुंगेर, सीतामढी आणि झांझारपूरमधून निवडणूक लढवणार आहे. याशिवाय मधुबनी, सिवान, हाजीपूर, वाल्मिकीनगर, पूर्व चंपारण, सिपौल शिवहार आणि वैशाली या जागांवरूनही आरजेडीचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
पूर्णियाची जागा गमावल्यानंतर पप्पू यादव मधेपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, मधेपुराची जागाही आरजेडीच्या खात्यात गेलीय. त्यामुळे पप्पूची निवडणूक लढवण्याची शक्यताही मावळली आहे.