नवी दिल्ली : जगात करोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावर पावले उचलली आहेत. कुठे कडक निर्बंध तर कुठे संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाकडून महत्वाची आणि कडक पावले उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सौदी अरेबियाने करोनाच्या संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकले असल्याचे सांगण्यात येत आहे. या देशांमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सौदी अरेबियाने दिला आहे. या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर तीन वर्षांसाठी प्रवासाची बंदी घालण्यात येणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
परराष्ट मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, काही सौदी नागरिक ज्यांना मे महिन्यात प्रशासनाने कोणत्याही परवानगीशिवाय परदेशात प्रवास करण्याची परवानगी दिली होती त्यांनी प्रवासी नियमांचे उल्लंघन केले आहे. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच ही परवानगी देण्यात आली होती.
“जर कोणी नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच मोठा दंड ठोठावला जाईल. याशिवाय त्यांच्यावर तीन वर्षांसाठी प्रवासबंदी घालण्यात येईल,” असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. सौदी अरेबियाने ज्या देशांमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.
सौदी अरेबियाने अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त. इथोपिया, भारत. इंडोनेशिया, लेबॅनन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करु नये असा आदेश आपल्या नागरिकांना दिला आहे. “नागरिकांना ज्या देशांनी अद्याप करोनावर नियंत्रण मिळवलेले नाही किंवा ज्या देशांमध्ये नवे विषाणू फैलावत आहेत तिथे थेट किंवा दुसऱ्या देशांमधून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे”.
तीन कोटी लोकसंख्या असणाऱ्या सौदी अरेबियात मंगळवारी १३७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या ५ लाख २० हजारांवर पोहोचली असून ८१८९ जणांचे मृत्यू झाले आहेत.