मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हा आकडा वाढू नये यासाठी लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करू नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
दरम्यान अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन लागू केलं आहे. या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. हंगेरीमध्येही वर्क फ्रॉम होम, डेनमार्कमध्येही तीच परिस्थिती, ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवण्यास सुरुवात झाली आहे. बेल्जियमने एक महिना परत लॉकडाऊन लागू केलाय. पोर्तूगाल सरकारने शहराशहरामधील नागरिकांची ये-जा थांबवली आहेत. आयर्लंडमध्ये डिसेंबर पासून कडक निर्बंध आहे. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहे. यूकेतही अडीच-तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर शिथिलता दिली जाते. इटली, जर्मनीतही तीच अवस्था आहे. लॉकडाऊन घातक आहे. पण आपण कात्रीत सापडल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.