पुणे – महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांपैकी 17 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 658 कर्मचाऱ्यांची बोगस कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचे चौकशी अहवालावरून स्पष्ट झाले. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 14 ग्रामसेवक आणि 2 कृषी विस्तार अधिकारी अशा एकूण 16 जणांना निलंबित केले. बोगस भरती प्रकरण या अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंचांना सुध्दा हे प्रकरण भोवण्याची चिन्हे आहेत. बोगस भरती झालेल्या काळातील सरपंचांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
“बोगस कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात’ या वृत्ताखाली बोगस भरतीचे प्रकरण दैनिक प्रभात ने 2 जुलै 2021 रोजी सर्वप्रथम प्रकाशित केले. त्यनंतर त्याचा पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्कालीन महिला व बालविकास अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने नुकताच 60 हजार पानांचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्त केला. यामध्ये 23 गावांमधील 21 ग्रामपंचायतीपैकी 17 ग्रामपंचायतींमध्ये बोगस कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. मांजरी बुद्रुक गावात 44 जणांची भरती झाली. या 17 गावांमध्ये काही ग्रामसेवकांनी व सरपंचांनी स्वत:च्या नातेवाईकांसह मेव्हणा, मुलगा, मुलगी, भाऊ यांची नियमबाह्यपणे भरती केली.
सर्वाधिक बोगस भरती ही नऱ्हे या गावात झाली आहे. यागावात 96 जण कर्मचारी असल्याचे दाखविण्यात आले. बावधनमध्ये 73 , मांगडेवाडी 30 ते 40, खडकवासला गावात 65 , कोंढवे धावडेमध्ये 64, न्यू कोपरे गावात 39 , गुजर निंबाळकरवाडीमध्ये 33 , होळकरवाडीमध्ये 37, तसेच मांगडेवाडी 36 , जांभुळवाडी- कोळेवाडी 44, वडाचीवाडी 14 , नांदेड 21, भिलारेवाडी 15 , औताडे हांडेवाडी 28, आणि सूस गावात 41 जणांची भरती झाल्याचे समोर आले.
ग्रामपंचायतीच्या सरपंचासह 212 सदस्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. त्याबाबतचा अहवाल पुणे महापालिका, विभागीय आयुक्त तसेच ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठविला आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.